कुसगाव : मराठी राजभाषा दिनानिमित्त येथील एन. बी. नवले महाविद्यालयामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ कवी सुरेश भट यांचे मराठी भाषा गौरव गीत गायिले गेले. या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. जयवंत देसाई यांनी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक, कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्याविषयी माहिती दिली; तसेच आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये सोशल मीडियात मराठीचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याविषयी सुचविले. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा;तसेच ती ज्ञानभाषा व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘लोकसंख्येच्या तुलनेत मराठी भाषा भारतामध्ये चौथ्या क्रमांकावर असून, जगातील ती १४ व्या क्रमांकाची आहे,’ असे डॉ. देसाई यांनी सांगितले.
या वेळी महाविद्यालयातील क्रीडा संचालक डॉ. अनिल कमलापुरे यांनी गुगल व्हॉईस टायपिंगच्या मदतीने मराठी टायपिंग करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.